नवोपक्रम Navopkram

 

नवोपक्रम Navopkram

शिक्षणक्षेत्रात अध्ययन-अध्यापन व सहशालेय कार्यक्रमांचे आयोजन करताना, प्रशासन व व्यवस्थापन करताना शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याची धडपड आपण करतच असतो. त्यात मिळालेल्या यशावर समाधान न मानता पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळा, नावीन्यपूर्ण मार्ग वापरून केलेला सर्जनशील उपक्रम म्हणजे 'नवोपक्रम' असे थोडक्यात म्हणता येईल. याचाच अर्थ प्रकल्पातील सर्व संकल्पना नवोपक्रमात समाविष्ट असतात, पण यात नवीनतेला अधिक प्राधान्य असते. उदा. उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविदयालयातील मुलींचा क्रीडा स्पर्धामधील सहभाग वाढविणे. उपक्रमाची उपयुक्तता लक्षात घेता प्रत्येक शिक्षकाने स्वतःच्या व आपल्या विदयार्थ्यांच्या, तसेच संस्थेच्या विकासासाठी दरवर्षी एखादा तरी उपक्रम हाती घेतला पाहिजे.

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी करीता
आपल्याला हव्या असलेल्या विषयावर मार्गदर्शनासह नवोपक्रम तयार करून, प्रिंट करून, बाईंडिंग करून स्पीड पोस्ट द्वारे आपल्या पत्त्यावर पोहच करण्याची सोय आहे.

नवोपक्रम कशासाठी :

१) नवीन वाटा शोधणाऱ्या, आगळा-वेगळा विचार करणाऱ्या शिक्षकांना आपले विचार कृतीत आणण्यास संधी मिळणे,

२) विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या समस्येवर स्व-प्रयत्नाने उपाय शोधण्याचा प्रयत्न करणे.

३) व्यवस्थापन, प्रशासन अथवा पर्यवेक्षण करताना वेगळ्या वाटेने जाऊन गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न करणे,

४) धडपडणाऱ्या व उत्कृष्टतेचा ध्यास असणाऱ्या शिक्षकाने सातत्याने स्व-प्रेरणा मिळवित राहणे.

५) नावीन्याच्या अभावी येणारी मरगळ, यांत्रिकता दूर करून उत्साहाने, नव्याने कार्यप्रेरित होणे.

नवोपक्रम करणाऱ्या शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये :

गुणवत्तेसाठी धडपड करणाऱ्या प्रत्येक शिक्षकामध्ये नवोपक्रम करण्यासाठी काही गुण असणे आवश्यक असते.

१) उपक्रमशील शिक्षक हा कल्पक असतो, तो जुन्याच्या अंमलबजावणीतही नवनवीन कल्पनांचा अंगीकार करून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडणारा व सर्जनशील शिक्षक असतो.

२) नवनिर्मितीचा ध्यास घेऊन अखंड चिकाटीने प्रयत्न करणारा असतो. अधूनमधून येणाऱ्या अपयशाने तो खचून जात नाही.

३) स्वयंप्रेरणेने विचार व कृती करणारा असतो. उत्कृष्टतेसाठी, गुणवत्तेसाठी तो इतरांच्या मार्गदर्शनावर, प्रेरणेवर अवलंबून नसतो.

४) सभोवतालच्या परिस्थितीतील प्रत्येक बाबीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. चांगल्या अनुकरणीय बाबींकडे त्याचे विशेष लक्ष असते.

५) तो भविष्यकाळाचा वेध घेऊन चिकित्सक विचार करणारा असतो. २० ते २५ वर्षांनंतरच्या समाजात समर्थपणे जगण्यासाठी आज आपल्या विद्यार्थ्यांमध्ये काय पेरायला हवे आहे याचा विचार तो सतत करीत असतो.

६) त्याची आपल्या व्यवसायावर पूर्ण निष्ठा असते. आपल्या कामाचे पावित्र्य, जबाबदाऱ्या व महत्त्व याची त्याला जाणीव असते व ती त्याच्या कामातून प्रतीत होते.

७) तो वेळेचा पुरेपूर वापर करून आपली सर्व कामे वेळेत, कार्यक्षमतेने आणि परिणामकारकतेने पूर्ण करणारा असतो.

नवोपक्रमाचे निकष :

शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आपण जे काही परंपरेपेक्षा वेगळे करतो त्याला नवोपक्रम म्हणतात. नवोपक्रमाचे निकष कोणते आहेत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

१) नवीनता : नवोपक्रम हा पारंपरिक उपक्रमापेक्षा वेगळा असतो. शाळा-शाळांमधून अनेक शिक्षक विविध उपक्रम घेतात; परंतु त्यात तोचतोचपणा असतो. एका ठिकाणी चाललेला उपक्रम दुसऱ्या शाळेत तसाच सुरू केला जातो काही शाळांमध्ये तर ठरावीक उपक्रम परंपरेने तसेच चाललेले असतात. त्याचे फायदे-तोटे यांचा विचार न करता व त्यात कोणताही बदल न करता जसेच्या तसे घेतले जातात. नवोपक्रमाची नवीनता पुढील तीन संदर्भात असते.

कालसापेक्ष नवीनता : एखादा उपक्रम पूर्वी कधीही झालेला नसेल तर त्याची नवीनता अधिकतम असते. परंतु एखाद्या शिक्षकाने पूर्वीच्या उपक्रमात नवीन काळास बदलत्या संदर्भास अनुसरून बदल करून त्याची परिणामकारक अंमलबजावणी केली तरीही तो त्या काळानुसार नवीनच ठरतो.

स्थलसापेक्ष नवीनता : एखादा उपक्रम इतरत्र झाला असेल, परंतु शिक्षकांच्या कार्यक्षेत्रात अथवा परिसरात पहिल्यांदाच होत असेल तर त्यात स्थलसापेक्ष नवीनता असते म्हणून शिक्षकांनी इतरत्र झालेल्या उपक्रमाची नवीनता कमी होते असे न समजता आपल्या शाळेत तो घेताना आवश्यक ते बदल करून व योग्य अशी साधने निवडून करावा.

व्यक्तिसापेक्ष नवीनता: शिक्षकाच्या स्वतःच्या दृष्टीने उपक्रम नवीन असतो. कारण त्याची उपक्रमाची उद्दिष्टे, साधने, मांडणी, उपयुक्तता या दृष्टीने शिक्षकाचे विचार व कल्पना नवीन असतात.

२) यशस्विता : नवोपक्रम सुरू करताना मनाशी धरलेले हेतू किंवा उद्दिष्टे उपक्रमाची अंमलबजावणी झाल्यानंतर साध्य झाली तर तो उपक्रम यशस्वी झाला असे म्हणता येते. अर्थात कोणताही उपक्रम १०० टक्के यशस्वी अथवा १०० टक्के अयशस्वी नसतो. ठरविलेल्या उद्दिष्टांपैकी कोणती उद्दिष्टे साध्य झाली व कोणती झाली नाहीत. ती कोणत्या कारणांमुळे साध्य झाली नाहीत हे शिक्षकाने लक्षात घ्यावे. उपक्रमात पूर्व स्थितीपेक्षा किती प्रमाणात बदल झाला याची नोंद घ्यावयाची असते आणि यासाठीच पूर्वस्थितीची निरीक्षणे व नोंदी महत्त्वाच्या असतात. उपक्रमाची यशस्विता शिक्षक स्वतः ठरवित असतो. ती यशस्विता इतरांच्या व स्वतःच्या लक्षात येण्यासाठी यशस्वितेचे प्रमाण ठरविण्याचे निकष शिक्षकाने उपक्रमाअगोदरच निश्चित करावयाचे असतात.

३) उपयुक्तता : एखादा उपक्रम दुसऱ्या परिस्थितीत वेगळ्या ठिकाणी अन्य शिक्षकाने वेगळी साधने वापरून केला व त्याला त्यात यश आले तर त्या उपक्रमाची उपयुक्तता अधिक आहे असा अर्थ होतो.

नवोपक्रम कार्यवाहीचे टप्पे :

नवीनता, यशस्विता व उपयुक्तता या निकषांवर विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीबाबत एखादया क्षेत्रात काम करायचे निश्चित झाल्यावर या उपक्रमाची कार्यवाही कोणत्या टप्प्याने करावी हे शिक्षकांना माहीत असणे आवश्यक आहे. ते टप्पे खालीलप्रमाणे आहेत.

१) समस्या निश्चिती सर्वप्रथम शिक्षकाने आपल्या मनात वारंवार येणाऱ्या गुणवत्ताविषयक समस्यांची यादी करावी. त्यांचा प्राधान्य क्रम लावावा. ज्या समस्या आपल्या आवाक्यातील आहेत त्यांचा प्राधान्याने विचार करावा. त्यातील महत्त्वाची वाटणारी समस्या कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे ते ठरवावे.

२) समस्यांच्या कारणांचा शोध त्यानंतर समस्येचे ढोबळ स्वरूप ठरवावे. ही समस्या का निर्माण झाली आहे. त्याची कारणे शोधावीत. ही समस्या सोडविणे का महत्त्वाचे आहे ते निश्चित करावे. त्यानंतर समस्येचे निश्चित स्वरूप ठरवावे. त्याचे शीर्षक ठरवावे.

३) नवोपक्रमाची उद्दिष्टे निश्चिती त्यानंतर करावयाच्या उपक्रमातून कोणत्या गोष्टी साध्य करावयाच्या आहेत. त्या कोणासाठी आहेत, त्यासाठी काय करावे लागेल, त्यामुळे कोणते बदल होतील इत्यार्दीचा विचार करावा. यातून नवोपक्रमाची उद्दिष्टे निश्चित करता येतात.

४) नवोपक्रमाची कार्यवाही याप्रमाणे उद्दिष्टे निश्चित केल्यानंतर उपक्रमाचे नियोजन करावे. त्यासाठी कोणते साहित्य तयार करावे लागेल. नवोपक्रम कोणासाठी आहे? कालावधी कोणता? कोणत्या टप्प्याने कार्यवाही करावयाची म्हणजे आधी काय करायचे? त्यानंतर काय करायचे आहे? निरीक्षणे कशी करणार? नोंदी कशा ठेवणार? निष्कर्ष कसे काढणार? यांचे नियोजन करावे. नवोपक्रमासाठी संबंधितांची पूर्व परवानगी काढणेही आवश्यक असते.

५) नियोजन पूर्ण झाल्याची खात्री करून नंतर कार्यवाही करावी ज्या वर्गावर अथवा गटावर काम करणार आहात, त्याची समस्येबाबत पूर्वस्थिती जाणून घ्यावी ज्या गोष्टी निरीक्षणात आढळतील त्यांची नोंद करावी. नंतर उपक्रमासाठी तयार केलेल्या किंवा उपलब्ध केलेल्या साहित्याचा वापर करावा. कार्यवाही टप्प्याटप्प्याने करताना प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या बदलांच्या नोंदी ठेवाव्यात.

६) कार्यवाही पूर्ण झाल्यावर नियोजनात असेल तर उत्तर चाचणी घ्यावी. सर्व संकलित माहितीचे संख्याशास्त्रीय वर्गीकरण व विश्लेषण करावे. यामध्ये प्रामुख्याने माहितीचे कोष्टकात रूपांतर करणे, शेकडेवारीत रूपांतर करणे, आलेख काढणे इत्यादीचा समावेश होतो.

७) मिळालेल्या माहितीवरून व निष्कर्षावरून उपक्रम कितपत यशस्वी झाला हे ठरवावे, उपक्रमाचा फायदा कोणाकोणाला व किती प्रमाणात झाला, कसा झाला, तयार केलेल्या साहित्याची परिणामकारकता कितपत दिसली इत्यादी ठरवावे.

नवोपक्रम अहवाल लेखनाचे टप्पे :

१) शीर्षक: समस्येच्या निश्चित स्वरूपाचे विधान लिहावे. यात अलंकारिक भाषा नसावी.

२) नवोपक्रमाची प्रस्तावना, गरज व महत्त्व उपक्रम निवडण्याचे कारण, क्षेत्र, क्षेत्रनिश्चिती, उपक्रमाचे वेगळेपण, उपयुक्तता इत्यादीचा तपशील.

३) नवोपक्रमाची उद्दिष्टे उपक्रमाचा फायदा कोणाला, कसा, कोणत्या स्वरूपात, कोणत्या कृतीमुळे होणार, या उपक्रमातून काय व कोणासाठी साध्य होणार, याबाबत ३ ते ५ विधानात्मक उद्दिष्टे मांडावीत. यामध्ये जे बदल अपेक्षित आहेत. त्या बदलाचे मापन करणारे दर्शकही नोंदवावेत.

४) नवोपक्रमाचे नियोजन :

संबंधित व्यक्तींशी, तज्ज्ञांशी चर्चा.

करावयाच्या कृतींचा क्रम.

उपक्रमासाठी इतरांची मदत.

कार्यवाहीचे टप्पे. (वेळापत्रक)

उपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे.

उपक्रमाचे स्थळ, कालावधी, खर्च.

५) नवोपक्रमाची कार्यवाही :

पूर्व स्थितीची निरीक्षणे व त्याच्या नोंदी, विश्लेषण व निष्कर्ष.

कार्यवाही दरम्यान निरीक्षणे व माहिती संकलन

उपक्रम पूर्ण झाल्यावर उत्तर, निरीक्षणे व त्याच्या नोंदी, विश्लेषण व निष्कर्ष,

कार्यवाहीत आलेल्या अडचणी.

माहितीचे विश्लेषण आलेख, तक्ते.

दर्शक उदिदष्टांमध्ये दर्शविल्याप्रमाणे.

यशस्विता : ठरविलेल्या उद्दिष्टांनुसार कोणकोणत्या घटकात, कोणकोणते व कोणत्या टप्प्याने बदल झाले, कोणत्या कृतीने बदल झाले या उपक्रमातून कोणासाठी व काय साध्य झाले याबाबतः तपशील कार्यवाहीच्या टप्प्यात चर्चा केल्यानुसार शेकडेवारी व आलेखांचा वापर करून स्पष्ट करावेत. शेकडेवारीच्या व आलेखांच्या वापरामुळे आपले म्हणणे आपल्याला अधिक नेमकेपणाने, स्पष्टपणे मांडता येते. उपक्रमाचे यश एका दृष्टिक्षेपात निरीक्षकाच्या अथवा कोणत्याही जिज्ञासू व्यक्तीच्या लक्षात येते. त्यामुळे शेकडेवारी, प्रमाणाचा व आलेखांचा वापर काळजीपूर्वक व कल्पकतेने करावा. जेथे शक्य नसेल तेथे पुराव्यादाखल वर्णनात्मक विधाने करण्यात यावीत उपक्रमासाठी केलेल्या साधनांची परिणामकारकताही नोंदवावी.

७) समारोप : नवोपक्रमाचे महत्त्व व त्याचे परिणाम यांची नोंद घेऊन आपण हाती घेतलेल्या नवोपक्रमाचा सारांश लिहा.

८) संदर्भग्रंथ व परिशिष्टे नवोपक्रम करताना ज्या संदर्भग्रंथांचा वापर केला त्यांची सूची दयावी. तसेच सहभागी विदयार्थी, त्यांच्यासाठी तयार केलेली पूर्व चाचणी, उत्तर चाचणी, प्रश्नावली इत्यादी जे असेल ते परिशिष्टांमध्ये जोडावे.

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी करीता
आपल्याला हव्या असलेल्या विषयावर मार्गदर्शनासह नवोपक्रम तयार करून, प्रिंट करून, बाईंडिंग करून स्पीड पोस्ट द्वारे आपल्या पत्त्यावर पोहच करण्याची सोय आहे.

 

Post a Comment

0 Comments